Tuesday, May 22, 2012

बंदी नको बंधन हवे



  ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे प्रत्येक प्रकरणाला उजवी व डावी बाजू असते. मग ते प्रकरण कोणतेही असो. क्रिकेटवेड्या भारतात सलग पाच वर्षे गाजणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या वाट्याला आतापर्यंत अनेक चढउतार आले. अनेकांच्या मते आयपीएल म्हणजे, मनोरंजन, तब्बल तीन तास मस्त धम्माल, उत्सुकता, चुरस, हृदयाचे ठोके चुकविणारे थरारक क्षण, सेलिब्रेशन यांचा एकोपा. तर काहींच्या मते, केवळ पैशांचा खेळ, असभ्य वर्तनुकीचा प्लॅटफॉर्म. असो, प्रत्येकाचा एखाद्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. क्रिकेट म्हटलं की, अनेकांचे लक्ष टीव्हीवर केंद्रित होत असते. काही वेळेला तर ते आपल्या हातातील कामे बाजूला ठेवून चक्क क्रिकेट पाहण्यात गुंततात. कमी वेळात लक्ष्यवेधी षटकार आणि चौकारांचा वर्षाव पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना आयपीएलच्या माध्यमातून मिळाली. त्यामुळे आयपीएल अनेकांच्या पसंतीस उतरले. मात्र सतत वादाच्या भोवर्‍यात अडकत चाललेल्या या आयपीलला आता चक्क बंद करण्याची मागणी होऊ लागली आहे. अर्थातच त्याला कारणेही तशी आहेत.
  आयपीएलमध्ये आता क्रिकेट कमी आणि स्कँडल जास्त होत आहेत. कधी शाहरूख खान दारू पिऊन धुमाकुळ घालतो, कधी मॅच फिक्सिंगचे प्रकरण समोर येते तर कधी खेळाडूंकडून पार्टीमध्ये मुलींशी छेडछाडीचे प्रकरण समोर येते. आता तर रेव्ह पार्टीमध्येही आयपीएलचे क्रिकेटपटू सापडले आहेत. मुंबई पोलिसांनी जुहु येथील ओकवूड हॉटेलमध्ये रविवारी रात्री झालेल्या या हायप्रोफाईल पार्टीत पुणे वॉरियर्सकडून खेळणारे वेन पार्नेल आणि राहुल शर्मा यांना अटक केली. ४ खेळाडूंना आणि काही प्रसिद्ध व्यक्ती पळून जाण्यात यश आले. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. या पार्टीत काही चिअरलीडर्सचाही समावेश होता. यासर्व प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरलेली आयपीएल स्पर्धा बंद करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. भाजपचे खासदार कीर्ती आझाद यांनी तर आयपील बंद करण्यात यावी यासाठी उपोषणही केले आहे. लोकसभेत शरद यादव, लालुप्रसाद यादव, यशवंत सिन्हा, सुब्रह्मण्यम स्वामी यांनीही या स्पर्धेवर टीका करून आयपीएल बंद करावी, अशी मागणी केली होती. मात्र ही अगदी टोकाची भूमिका असल्याचे दिसते. असे झाल्यास अनेक खेळाडूंचे भवितव्य धोक्यात येऊ शकते, असे वाटते.  अनेक जण फक्त आयपीएलच्या नकारात्मक बाबींविषयी भाष्य करतात. अर्थात यामागेही काही कारणे असतील. पण, सातत्याने याच गोष्टींवर प्रकाशझोत कशाला टाकायचा? आयपीएलमुळे बरेच चांगले खेळाडू भारताला मिळाले आहेत. आणि यापुढेही मिळतील. आयपीएलमुळे खेळाडूंना मोठ्या रकमेचे करार मिळत आहेत. यामुळे खेळाडू आर्थिकदृष्ट्‌या लवकर स्थिरावत आहेत. नवोदित खेळाडूंना आपल्या रोजचा खर्च सांभाळून खेळावर लक्ष केंद्रित करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. घरच्यांचा पाठिंबा मिळत असतो. मात्र आपले करियर घडवताना होणारी धावपळ खेळाडूंचे मन व्यथित करून जात असते. त्यामुळे अशा आयपीएल लीगद्वारे मिळणार्‍या करारामुळे खेळाडूंच्या पैशाचा प्रश्न थोड्याफार प्रमाणात का होईना मिटण्यास मदत होत असते. तालुका-राज्य पातळीवर खेळणार्‍या क्रिकेटपटूंसाठी आयपीएल हे राष्ट्रीय व्यासपीठ आहे. आजवर जे खेळाडू क्रिकेटच्या परीघापलीकडे असायचे त्यांच्यापर्यंत आयपीएलच्या रूपाने संधी मिळालेली आहे. आज या खेळाडूंमध्ये कोणताही जय, पराजय कोणत्याही क्षणी पालटण्याची क्षमता आहे. आयपीएलच्या माध्यमातून काही खेळाडू राष्ट्रीय संघाला मिळाले आहेत. एकंदरीत पहिल्यास, आयपीएलचा केवळ तोटा नाही फायदाही आहे. त्यामुळे आयपील जरी वादाच्या भोवर्‍यात अडकलेले असले तरी ते बंद न करता नियमांच्या बंधनात आणावे. यामुळे काही प्रमाणात गैरवर्तवणुकीसारख्या प्रकरणांवर आळा घालता येऊ शकतो.  ज्याप्रमाणे उद्योगसमूहांनी आयपीएलमध्ये गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला आहे त्याप्रमाणे त्यांनी कबड्डी, कुस्ती अशा देशी खेळांकडेही वळवायला हवे. आयपीएलपैकी काही टक्के निधी या खेळांना मिळाला तरी यामधून अनेक गुणी खेळाडू पुढे येऊ शकतील. आयपीएलप्रमाणे इतर देशी खेळांना ग्लॅमर मिळवून देण्याचा प्रयत्न केल्यास सर्व खेळांमध्ये समतोल साधणे सोपे जाईल आणि देशी खेळांची गुणवत्ताही अधिक सुधारेल.

Friday, February 17, 2012

ओळख भारतीय सांकेतिक भाषेची

बहुभाषिक देश अशी भारताची विश्वात ख्याती. अनेक भाषांप्रमाणेच अस्तित्वात असलेली एक नैसर्गिक भाषा म्हणजे भारतीय सांकेतिक भाषा (आय.एस.एल.). ही डेफ व्यक्तींची मातृभाषा. खुणांची भाषा असेही हीची ओळख. जागतिक मातृभाषा दिनानिमित्त भारतीय सांकेतिक भाषेची ओळख पटवून घेऊ. उल्लेखनिय म्हणजे १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले होते.
भारतामध्ये गेली अनेक शतके भारतीय सांकेतिक भाषा डेफ व्यक्तिंकडून वापरली जात आहे. भरतनाट्यमकिंवा भारतीय शुर्पनखेचे उदाहरण पाहता भारतामध्ये आयएसएल प्राचिन काळापासून अस्तित्वात असल्याचे निदर्शनात येत. आयएसएलचा अभ्यास १९८० च्या पूर्वार्धात भारतामध्ये शास्त्रीय पद्धतीने सुरु झाला.
भारतीय सांकेतिक भाषा ही भारतीय डेफ समाजाची एक अद्वितीय कृती आहे. वाचा आणि श्रवण दोष असलेल्या व्यक्तींची भारतीय सांकेतिक भाषा ही मायबोलीच. या भाषेला इतर भाषांप्रमाणे लिहिले जात नाही. मात्र दृश्य आणि श्राव्य या माध्यमातून शिकता येते. आणि व्हिडियो, कॉम्पुटर यांच्या सहाय्याने एकमेकांबरोबर अभ्यास करता येते. व्याकरण आणि भाषा याच्या प्रयोगानेच शिकता येते. आयएसएल ही भारताची आपली स्वत:ची भाषा आहे. ही भाषा दुसर्‍या भाषेशी संबंधित नाही. कोणत्याही विदेशी भाषेशीही प्रभावित नाही. भारतात दरवर्षी २७ हजार डेफ मुलं जन्माला येतात आणि पुढे ते आपापल्या क्षमतेनुसार व श्रवण क्षमतेनुसार आयएसएलचा वापर करत असतात. सध्या स्थितीत भारतात सुमारे १५ लाख व्यक्ती आयएसएलचा वापर करतात.
भारत आणि जवळपासच्या देशांमध्ये डेफ व्यक्तिंचा समुह बर्‍याच प्रमाणावर आहे. ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इंडिया या संस्थेच्या अनुमानानुसार भारतात डेफ व्यक्तिंची संख्या ४ मिलियन इतकी आहे. आणि भारतातील मोठ्या शहरांमध्ये या सांकेतिक भाषांवर प्रयोग होत असतात. सांकेतिक भाषेची सुरुवात इ.पू. ५ व्या शतकात किटीलसमध्ये झाली. आपल्याला बोलत येत नाही आणि आपले म्हणने इतरांना सांगण्यासाठी हातवारे हावभाव यांचा वापर केला जात असतो. भारतीय सांकेतिक भाषा केवळ भारताताच नाही तर बांगलादेश, पाकिस्तान आणि नेपाळ या शेजारील देशांमध्येही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. डॉ. मदन वशिष्ट, वुड वर्ड विल्सन आणि अलराक्जेशन यांनी मिळून केलेल्या संशोधन कार्यातूनच, सांकेतिक भाषा ही डेफ समुदायाचा एक विभिन्न अंग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१९९०च्या दशकात डॉ. उलरीक यांनी भारतीय उपखंडातील आयएसएलचा अभ्यास केला. आणि त्यांना येथे वापरण्यात येणार्‍या या भाषेत साम्य असल्याचे आढळून आले. पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगलादेश या देशात वापरले जाणारे व्याकरण एकच आहे. आपल्या देशात श्रवण दोष असलेल्या १० लाख व्यक्ती आणि पाच लाख हेअरींग इंपेड मुले या भाषेचा वापर करतात. आज २०१२ मध्ये या आकड्यांत अधिक प्रमाणात वाढ झाली आहे. या भाषेला अधिक व्यापकता मिळावी यासाठी भारतात सांकेतिक भाषेचा पाठ्यक्रम२००१ मध्ये भारतीय पुनर्वसन परिषद (आर. सी. आय.) यांच्या सहयोगाने अली यावर जंग राष्ट्रीय श्रवण विकलांग संस्था (ए.वाय.जे.एन.आय.एच.एच.) या मुंबईतील संस्थेत सुरु करण्यात आला. तसेच ते आय.एस.एल. शिक्षक आणि इंटरप्रीटर्सही तयार करण्याचे प्रयत्न जोमाने करत आहेत. या संस्थेने २००८ मध्ये डिप्लोमा इन साईन लँग्वेज इंटरप्रीटर कोर्सचा (डि.एस.एल.आय.सी) प्रारंभ केला. या संस्थेची भारतात सात केंद्रे आहेत आणि ४५ प्रमाणपत्रधारक इंटरप्रीटर्स आहेत. डेफ व्यक्तिंचा समावेश हा अपंगत्व समुदायात केला जातो. या समुदायात सात प्रकारच्या अपंग गटाचा समावेश आहे. समाजात या समुदायाला समान अधिकार मिळावा यासाठी भारत देश विश्व स्तरावर करारबद्ध झाला आहे. या कार्यासाठी अली यावर जंग ही संस्था नेहमीच अग्रेसर असते. केवळ डेफ व्यक्तीच नाहीत तर नॉर्मल व्यक्तींही ही भाषा शिकण्यावर अधिक भर देत असल्याचे दिसते.
के. सी. मार्ग वांद्रे रिक्लेमेशन, वांद्रे पश्चिममुंबई ५० येथे असलेली अली यावर जंग या संस्थेची स्थापना ९ ऑगस्ट १९८३ रोजी झाली. सामाजिक न्याय आणि विकास मंत्रालयाच्या अधिपत्याखाली ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेशी संपर्क साधण्यासाठी ०२२-२६४० ०२१५ / ०२२८ असा दुरध्वीनी क्रमांक आहे तसेच ayjnihhmum@gmail.com संकेत स्थळही उपलब्ध आहे. अली यावर जंग आणि मुंबई विद्यापीठातील संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग (MCJ ) यांनी संयुक्तरीत्या एक वर्षाचा कालावधी असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मिडिया ऍण्ड डिसऍबिलीटी कम्युनिकेशन या कोर्सची सुरुवात २०१२ सालापासून केली आहे. ऍक्सेसिबल मिडिया प्रोग्रामआणि युनिव्हर्सल डिझाईन हे या कोर्सचे वैशिष्ट्य आहे. मिडिया क्षेत्रात या स्पेशलायझेशनच्या आधारावर विद्यार्थी आपली कारकिर्द घडवू शकतो. या एक वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्सेसिबल मिडिया प्रोग्रामआणि प्रोडक्स शिकण्याची संधी आहे. ऍक्सेसिबल फॉर्मेटमध्ये शॉर्ट फिल्म्स बनविणे, डिझिटल मिडियाचे मार्केट वाढविणे, कॅप्शनिंग, ऑडिओ डिस्क्रिप्शन, भारतीय सांकेतिक भाषा आणि ऍक्सेसिबल संकेत स्थळ बनविणे हे केवळ शिकण्यासच नाही तर आपल्याला प्रॅक्टिकली करण्याची सुवर्ण संधी मिळते. या कोर्सची फी १९ हजार रुपये आहे मात्र हॉस्टेलची सुविधा पाहिजे असल्यास ३१,६०० अशी रक्कम आकारण्यात येते. हा कोर्स करण्याची संधी केवळ ज्यानी पत्रकारितेत डिप्लोमा किंवा डिग्री किंवा पब्लिक रिलेशन कोर्स केलेला असेल त्यांनाच मिळणार आहे.
------------------------------------------------------------------------------------------------
सर्वच डेफ मुलांनी भारतीय सांकेतिक भाषा शिकण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. तसेच इंटरप्रीट्‌र्स असलेले टिव्ही चॅनल्सही पाहिले पाहिजे. नॉर्मल व्यक्तिंनी ही भाषा शिकून डेफ समुदयाशी संवाद साधला पाहिजे. अनुसुचित यादीत या भाषेला स्थान मिळावे यासाठी अली यावर जंग प्रयत्न करत आहे. तंत्रज्ञानाकडे आकर्षित होण्यासाठी अली यावर जंग ही संस्था व्हीडिओ रिमोट इंटरप्रीटींग सर्विसचा वापर करत असून ते लोकप्रिय होण्यासाठी प्रयत्नही करत असल्याचे अली यावर जंग या राष्ट्रीय विकलांग संस्थेचे संचालक प्रो. आर. रंगासाई यांनी म्हटले आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------